श्री रामदास स्वामीकृत श्री मनाचे श्लोक ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ॥ मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ॥२॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधीं वदावा ॥ सदाचार हा थोर सोडूं नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥४॥ मना पापसंकल्प सोडूनी द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥ मना कल्पना ते नको वीषयाची । विकारे धडे हो जनी सर्व ची ची ॥५॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी ॥ नको रे मना लोभ हा अंगिकारूं । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ देहे त्यागितां कीर्ती मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ मना चंदनाचेपरि त्वां झिजवे । परी अंतरी सज्जना नीववावें ॥८॥ नको रे मना द्रव्य तें पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ॥ घडे भोगणें पाप तें कर्म खोटे । न होतां मनासारिखे दुःख मोठें ॥९॥ सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी । दुखाची स्वये सांडि जीवीं करावी ॥ देहेदुःख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें ॥१०॥ जनी सर्व सूखी असा कोण आहे । विचारे मना तूंचि शोधूनि पाहे ॥ मना त्वांचि रे पूर्वसंचित केले । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥११॥ मना मानसीं दुःख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेकें देहेबुद्धि सोडूनी द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना सांग पां रावणा काय झाले । अकस्मात तें राज्य सर्वै बुडाले ॥ म्हणोनी कुडी वासना सांडिं वेगीं । बळे लागला काळ हा पाठिलागीं ॥१३॥ जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला । परी शेवटीं काळमूखी निमाला ॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥ मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाति ॥१५॥ मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे ॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुते जन्म घेतें ॥१६॥ मनी मानव व्यर्थ चिंता वहातें । अकस्मात होणार होऊनी जातें ॥ घडे भोगणें सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥ मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ती तूं रे ॥ जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणें । तया वर्णितां सर्वही श्र्लाघ्यवाणें ॥१८॥ मना सर्वथा सत्य सोडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ॥ मना सत्य तें सत्य वाचे वदावे । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावे ॥१९॥ बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तेचि मोठी ॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासीं । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥२०॥ मना वासना चूकवीं येरझारा । मना वासना सांडि रे द्रव्यदारा ॥ मना कामना थोर हे गर्भवासीं । मना सज्जना भेटवीं राघवासी ॥२१॥ मना सज्जना हीत माझें करावें । रघूनायका दृढ चित्तीं धरावें ॥ महाराज तो स्वामी वायूसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥ न बोले मना राघवावीण कांहीं । जनीं वाउगें बोलतां सौख्य नाहीं ॥ घडीनें घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडूं पहातो ? ॥२३॥ रघूनायकावीण वाया शिणावें । जनांसारिखें व्यर्थ कां वोसणावें ॥ सदासर्वदा नाम वाचे वसों दे । अहंता मनी पापिणी ते नसों दे ॥२४॥ मना वीट मानूं नके बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैचा ॥ सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥२५॥ देहेरक्षणाकारणें यत्न केला । परी शेवटी काळ घेवोनि गेला ॥ करीं रे मना भक्ति या राघवाची । पुढें अंतरी सोडिं चिंता भवाची ॥२६॥ भवाच्या भयें काय भीतोस लंडी । धरीं रे मना धीर धाकासि सांडीं ॥ रघुनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥ दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखता काळ पोटी थरारी ॥ मना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥ पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ॥ पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२९॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥ महासंकटीं सोडिले देव जेणें । प्रतापें बळे आगळा सर्व गूणें ॥ जयातें स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥ अहल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥ वसे मेरुमांदार हें सृष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणें मेघमाळा ॥ चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥ उपेक्षा कदा रामरूपी असेना ॥ जिवा मानवा निश्र्चयो तो वसेना ॥ शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३४॥ असे हो जया अंतरी भाव जैसा ॥ वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यासि रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणें अल्प धरिष्ट पाहे ॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥ सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा ॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥ मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊन पाहे ॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३८॥ जया वर्णिती वेदशास्त्रें पुराणे । जयाचेनि योगें समाधान बाणे ॥ तयालागिं हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३९॥ मना पाविजे सर्वही सूख जेथें । अती आदरें ठेविजे लक्ष तेथें ॥ विवेकें कुडी कल्पना पालटींजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४०॥ बहू हिंडता सौख्य होणार नाहीं । शिणावे परी नातुडे हीत कांहीं ॥ विचारें बरें अंतरा बोधवींजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४१॥ बहूतांपरी हेंचि आता धरावें । रघूनायका आपुलेंसें करावें ॥ दिनानाथ हें तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४२॥ मना सज्जना एक जीवीं धरावे । जनी आपुलें हीत तूवां करावें ॥ रघूनायकावीण बोलों नको हो । सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥ मना रे जनी मौनमुद्रा धरावी । कथा आदरें राघवाची करावी ॥ नसे राम ते धाम सोडूनी द्यावें । सुखालागिं आरण्य सेवीत जावें ॥४४॥ जयाचेनि संगें समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥ तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीनें मती राम सोडी ॥४५॥ मना जे घडी राघवावीण गेली । जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥ रघूनायकावीण तो शीण आहे । जगीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥ मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता भक्त होऊनि राहे ॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥ सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा । सदा रामनामें वदे नित्य वाचा ॥ स्वधर्मेंचि चाले सदा उत्तमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥ सदा बोलण्यासारिखें चालताहे । अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥ सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥ नसे अंतरी काम नानाविकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥ निवाला मनीं लेश नाहीं तमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥ मदें मत्सरें सांडिला स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥ सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥ क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादें । न लिंपे कदा दंभवादे विवादें ॥ करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥ सदा आर्जवी प्रीय जो सर्वलोकीं । सदासर्वदा सत्यवादी विवेकी ॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥ सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥ नसे मानसीं नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥ ऋणी देव हे भक्तिभावो जयाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥ दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जगीं दासपाळू ॥ तया अंतरी क्रोध संताप कैंचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥ जगीं होइजे धन्य या रामनामें । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥ उदासीनता तत्वतां सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे ॥५७॥ नको वासना वीषयी वृत्तिरूपें । पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥ सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोही नसावा ॥५८॥ मना कल्पना कल्पितां कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥ मनीं कामना राम नाहीं जयाला । अती आदरे प्रीती नाहीं तयाला ॥५९॥ मना राम कल्पतरू कामधेनू । निधी सार चिंतामणी काय वानूं ॥ जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आतां ॥६०॥ उभा कल्पवृक्षातळीं दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेंचि राहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढें मागुता शोक जीवीं धरावा ॥६१॥ निजध्यास तो सर्व तूटोनि गेला । बळें अंतरी शोक संताप ठेला ॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला । मना निश्चयो सर्व खेदें उडाला ॥६२॥ घरी कामधेनू पुढें ताक मागे । हरीबोध सांडूनि वीवाद लागे ॥ करी सार चिंतामणी काचखंडें । तया मागता देत आहे उदंडें ॥६३॥ अती मूढ त्य दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्तीं वसेना ॥ अती लोभ त्य क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥ नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥ धरी रे मना आदरें प्रीती रामीं । नको वासना हेमधामीं विरामीं ॥६५॥ नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥ जनी वीष खातां पुढें सूख कैचें । करीं रे मना ध्यान या राघवाचे ॥६६॥ घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६७॥ बळें आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥ पुढें मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६८॥ सुखानंदकारी निवारी भयातें । जनीं भक्तिभावे भजावे तयातें ॥ विवेकें त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६९॥ सदा रामनामें वदा पूर्णकामें । कदा बाधिजेना पदा नित्य नेमें ॥ मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७०॥ जयाचेनि नामें महादोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती ॥ जयाचेनि नामें घडे पुण्य ठेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७१॥ न वेचें कदा ग्रंथिचें अर्थ कांही । मुखें नाम उच्चारीतां कष्ट नाहीं ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७२॥ देहेदंडनेचे महादुःख आहे । महादुःख तें नाम घेतां न राहे ॥ सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥ बहुतांपरी संकटे साधनाचीं । व्रते दान उद्यापनें तीं धनाचीं ॥ दिनाचा दयाळू मनीं आठवावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥ समस्तांमधें सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधून पाहें ॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥ नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामीं धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७६॥ करी काम निष्काम या राघवाचें । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥ करी छंद निर्द्वंद्व हे गूण गातां । हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां ॥७७॥ अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं । तया पामरा बाधिजे सर्व कांहीं ॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥ मना पावना भावना राघवाची । धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥ भवाचि जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥७९॥ धरा श्रीधरा त्या हराअंतरातें । तरा दुस्तरा त्या परा सागरातें ॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मत्सरातें ॥८०॥ मना मत्सरें नाम सांडूं नको हो । अती आदरें हा निजध्यास राहो ॥ समस्तांमधें नाम हें सार आहे । दुजी तूळणा तूळतांही न साहे ॥८१॥ बहु नाम या रामनामीं तुळेना । अभाग्या नरा पामरा हें कळेना ॥ विषा औषध घेतलें पार्वतीशें । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥८२॥ जेणें जाळिला काम तो राम ध्यातो । उमेसीं अती आदरें गूण गातो ॥ बहुज् ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें । परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥ विठोनें शिरीं वाहिला देवराणा । तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा ॥ निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥ भजा राम विश्राम योगेश्वराचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥ स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं ॥८५॥ मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे । सदानंद आनंद सेवूनि राहे ॥ तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हें नाम शोकापहारी ॥८६॥ मुखीं राम त्या काम बांधू शकेना । गुणें इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामास मारी । जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥ बहू चांगले नाम या राघवाचें । अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें ॥ करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । दिनां मानवां हेंचि कैवल्य साचें ॥८८॥ जनीं भोजनीं नाम वाचें वदावें । अती आदरें गद्यघोषें म्हणावें ॥ हरीचिंतनें अन्न जेवीत जावें । तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥८९॥ न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥ हरीनाम हें वेदशास्रीं पुराणीं । बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥९०॥ नको वीट मानूं रघूनायकाचा । अती आदरें बोलिजे राम वाचा ॥ न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा । करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥ अती आदरें सर्वही नामघोषें । गिरीकंदरीं जाइजे दूरि दोषें ॥ हरी तिष्ठतू तोषला नामतोषें । विशेषें हरा मानसीं रामपीसें ॥९२॥ जगीं पाहतां देव हा अन्नदाता । तया लागली त्वतां सार चिंता ॥ तयाचे मुखीं नाम घेतां फुकाचें । मना सांग पां रे तुझे काय वेंचे ॥९३॥ तिन्ही लोक जाळू शके कोप येतां । निवाला हरू तो मुखें नाम घेतां ॥ जपे आदरें पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेंचि हें नाम आता ॥९४॥ अजामेळ पापी वदे पुत्रकामें । तया मुक्ति नारायणाचेनि नामें ॥ शुकाकारणें कुंटणी राम वाणी । मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥९५॥ महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं । जपे रामनामावळी नित्य काळीं ॥ पिता पापरूपी तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ॥९६॥ मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची ॥ पुढें अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥ हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवदेहधारी ॥ तया रामनामीं सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥ जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजि जातां गती पूर्वजांसी ॥ मुखें रामनामावळी नित्यकाळीं । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥ यथासांग रे कर्म तेंही घडेना । घडे धर्म तों पुण्य गाठीं पडेना ॥ दया पाहतां सर्व भूतीं असेना । फुकाचें मुखीं नाम तेंही वसेना ॥१००॥ जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची ॥ म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें । मुखें बोलतां दोष जाती स्वभावें ॥१०१॥ अती लीनता सर्वभावें स्वभावें । जना सज्जनालागिं संतोषवावें ॥ देहे कारणीं सर्व लावीत जावें । सगूणीं अती आदरेंसीं भजावें ॥१०२॥ हरीकीर्तनें प्रीती रामीं धरावी । देहेबुद्धि नीरुपणीं वीसरावी ॥ परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवीं करावी ॥१०३॥ क्रियेवीण नानापरी बोलिजेतें । परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥ मना कल्पना धीट सैराट धांवे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥ विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ॥ जनीं बोलण्यासारिखें चाल बापा । मना कल्पना सोडिं संसारतापा ॥१०५॥ बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा ॥ दया सर्वभूतीं जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला ॥१०६॥ मना कोपआरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी ॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं । मना होई रे मोक्षभागीं विभागी ॥१०७॥ मना सर्वदा सज्जनाचेनि योगें । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥ क्रियेवीण वाचाळता ते निवारीं । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥ जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं सूखसंवाद सूखें करावा ॥ जगीं तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥ तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें । विवेकें अहंभाव याते जिणावें ॥ अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥ हिताकारणें बोलणें सत्य आहे । हिताकारणें सर्व शोधूनि पाहे ॥ हिताकारणें बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥ जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥ उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥ जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ॥ तयाहूनि व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहें ॥११३॥ फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे । दिसेंदीस अभ्यंतरीं गर्व सांचे ॥ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारें तुझा तूंचि शोधूनि पाहें ॥११४॥ तुटे वाद संवाद तेथें करावा । विवेकें अहंभाव हा पालटावा ॥ जनीं बोलण्यासारिखें आचरावें । क्रियापालटें भक्तिपंथेचि जावें ॥११५॥ बहू श्रापितां कष्टला अंबऋषी । तयाचें स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥ दिला क्षीरसिंधू तया ऊपमानीं । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥ धुरू लेंकरूं बापुडें दैन्यवाणें । कृपा भाकितां दीधली भेटि जेणें ॥ चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥ गजेंद्रू महासंकटीं वास पाहे । तयाकारणें श्रीहरी धांवताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥ अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला ॥ अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥ विधीकारणें जाहला मत्स्य वेगीं । धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागी ॥ जना रक्षणाकारणें नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥ महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनी तयाकारणें सिंह जाला ॥ न ये ज्वाळ वीशाळ संनीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तयाकारणें वामनू चक्रपाणी ॥ द्विजांकारणें भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२२॥ अहल्येसतीलागिं आरण्यपंथें । कुडावा पुढें देव बंदीं तयातें ॥ बळें सोडितां घाव घाली निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१२३॥ तये द्रौपदीकारणे लागवेगें । त्वरें धांवतो सर्व सांडूनि मागें ॥ कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥ अनाथां दिनांकारणे जन्मताहे । कलंकी पुढें देव होणार आहे ॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥ जनाकारणें देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥ तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥१२६॥ जगीं धन्य तो रामसूखें निवाला । कथा ऐकतां सर्व तल्लीन झाला ॥ देहेभावना रामबोधें उडाली । मनोवासना रामरूपीं बुडाली ॥१२७॥ मना वासना वासुदेवीं वसों दे । मना कामना कामसंगीं नसों दे ॥ मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥१२८॥ गतीकारणें संगती सज्जनाची । मती पालटें सूमती दुर्जनाची ॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनाऽतीत होऊनि राहें ॥१२९॥ मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥ जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळीं भजावा ॥१३०॥ भजाया जनीं पाहतां राम एकू । करीं बाण एकू मुखीं शब्द एकू ॥ क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विवेकू ॥१३१॥ विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥ बरें शोधल्यावीण बोलों नको हो । जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥ हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी । जेणे मानसीं स्थापिलें निश्चयासी ॥ तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे । तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥१३३॥ नसे गर्व आंगीं सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥ नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इंहीं लक्षणीं जाणिजे योगीराणा ॥१३४॥ धरीं रे मना संगती सज्जनाची । जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥ बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥ भये व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत तें संत आनंत पाहें ॥ जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना । भय मानसीं सर्वथाही असेना ॥१३६॥ जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥ देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३७॥ भ्रमें नाडळे वित्त तें गुप्त जालें । जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आलें ॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३८॥ पुढें पाहतां सर्वहीं कोंदलेंसे । अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥ अभावें कदा पुण्य गांठीं पडेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३९॥ जयाचें तया चूकलें प्राप्त नाही । गुणें गोविलें जाहलें दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१४०॥ म्हणे दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥ गुरू-अंजनेंवीण तें आकळेना । जुनें ठेवणें मीपणें तें कळेना ॥१४१॥ कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥ गळेना गळेना अहंता गळेना । बळें आकळेना मिळेना मिळेना ॥१४२॥ अविद्यागुणें मानवा ऊमजेना । भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ॥ परीक्षेविणें बांधिलें दृढ नाणें । परी सत्य मिथ्या असें कोण जाणे ॥१४३॥ जगीं पाहतां साच तें काय आहे । अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥ पुढें पाहतां पाहतां देव जोडे । भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥१४४॥ सदा वीषयो चिंतितां जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥ विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें । जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें ॥१४५॥ दिसें लोचनीं तें नसे कल्पकोडी । अकस्मात आकारलें काळ मोडी ॥ पुढें सर्व जाईल कांहीं न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४६॥ फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचलें मीपणें तें कळेना ॥ तया एकरूपासि दूजें न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४७॥ निराकार आधार ब्रह्मादिकांचा । जया सांगता शीणली देववाचा ॥ विवेकें तदाकार होऊनि राहें । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४८॥ जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे । जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे ॥ जगीं पाहतां पाहणें जात आहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४९॥ नसे पीत नसे श्वेत ना श्याम कांहीं । नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१५०॥ खरे शोधितां शोधितां शोधिताहे । मना बोधितां बोधितां बोधिताहे ॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगें । बरा निश्चयो पाविजे सानुरागें ॥१५१॥ बहूतां परी कूसरी तत्वझाडा । परी अंतरीं पाहिजे तो निवाडा ॥ मना सार साचार तें वेगऴें रे । समस्तांमधे एक तें आगळें रे ॥१५२॥ नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्वज्ञानें । समाधान कांही नव्हे तानमानें ॥ नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें । समाधान तें सज्जनाचेनि योगें ॥१५३॥ महावाक्य तत्वादिकें पंचिकर्णें । खुणे पाविजे संतसंगे विवर्णें ॥ द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥१५४॥ दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहे । बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ॥ करीं घेउं जातां कदा आडळेना । जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना ॥१५५॥ म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे । अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥ जनीं मीपणें पाहतां पाहवेना । तया लक्षितां वेगळें राहवेना ॥१५६॥ बहू शास्त्र धुंडाळतां वाड आहे । जया निश्चयो येक तोही न साहे ॥ मती भांडती शास्त्रबोधें विरोधें । गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥१५७॥ श्रुती न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें । स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें ॥ स्वयें शेष मौनावला स्थीर राहे । मना सर्व जाणीव सांडून पाहें ॥१५८॥ जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रुची प्राप्त कैंची ॥ अहंभाव ज्या मानसींचा विरेना । तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना ॥१५९॥ नको रे मना वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी ॥ नको रे मना शिकऊं पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपासीं ॥१६०॥ अहंतागुणे सर्वही दुःख होतें । मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ॥ सुखी राहतां सर्वही सूख आहे । अहंता तुझी तूंचि शोधूनि पाहें ॥१६१॥ अहंतागुणें नीति सांडि विवेकी । अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं ॥ परी अंतरीं सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते ॥१६२॥ देहेबुद्धिचा निश्चयो दृढ झाला । देहातीत तें हीत सांडीत गेला ॥ देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६३॥ मनें कल्पिला वीषयो सोडवावा । मनें देव निर्गूण तो वोळखावा ॥ मनें कल्पिता कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥ देहादीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चीत ठेला ॥ हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥ अहंकार विस्तारला या देहाचा । स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ॥ बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥ बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥ घडीनें घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६७॥ करी वृत्ति जो संत तो संत जाणा । दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा ॥ उपाधी देहेबुद्धितें वाढवीते । परी सज्जना केविं बाधूं शके ते ॥१६८॥ नसे अंत आनंत संतां पुसावा । अहंकार विस्तार हा नीरसावा ॥ गुणेंवीण निर्गूण तो आठवावा । देहेबुद्धिचा आठवो नाठवावा ॥१६९॥ देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी । विवेकें तये वस्तुची भेट घ्यावी ॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें । म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें ॥१७०॥ असे सार साचार तें चोरिलेंसे । इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे ॥ निराभास निर्गूण तें आकळेना । अहंतागुणे कल्पितांही कळेना ॥१७१॥ स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥ मुळीं कल्पना दों रुपें तेचि जाली । विवेकें तरी स्वस्वरूपीं मिळाली ॥१७२॥ स्वरुपीं उदेला अहंकार राहो । तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहो ॥ दिशा पाहतां ते निशा वाढताहे । विवेकें विचारें विवंचूनि पाहें ॥१७३॥ जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना । भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना ॥ क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो । दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो ॥१७४॥ विधी निर्मिता लीहीतो सर्व भाळीं । परी लीहीतो कोण त्याचे कपाळीं ॥ हरू जाळितो लोक संहारकाळीं । परी शेवटीं शंकरा कोण जाळी ॥१७५॥ जगीं द्वादशादित्य ते रुद्र अक्रा । असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥ जगीं देव धुंडाळितां आढळेना । जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना ॥१७६॥ तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना कळेना कदा दैन्यवाणा ॥ कळेना वळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जनीं मीपणासी ॥१७७॥ जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधूनि कोणी न पाहे ॥ जगीं पाहतां देव कोट्यानुकोटी । जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥१७८॥ तिन्ही लोक जेथून निर्माण जाले । तया देवरायासि कोणी न बोले ॥ जगीं थोरला देव तो चोरलासे । गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥ गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥ मनीं कामना चेटकें धातमाता । जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥१८०॥ नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू । नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू । जगीं ज्ञानिया तोचि साधू असाधू ॥१८१॥ नव्हे वाउगी चाहुटी काम पोटीं । क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥ मुखीं बोलल्यासारिखें चालताहे । मना सद्गुरु तोचि शोधूनि पाहें ॥१८२॥ जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी । कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥ प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगें समाधान बाणे ॥१८३॥ नव्हे तेंचि जालें नसे तेंचि आलें । कळों लागलें सज्जनाचेनि बोलें ॥ अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें । मना संत आनंत शोधीत जावें ॥१८४॥ लपावें अती आदरें रामरुपीं । भयातीत निश्चीत ये स्वस्वरूपीं ॥ कदा तो जनीं पाहतांही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना ॥१८५॥ सदा सर्वदा राम सन्नीध आहे । मना सज्जना सत्य शोधून पाहें ॥ अखंडीत भेटी रघूराजयोगू । मना सांडिं रे मीपणाचा वियोगू ॥१८६॥ भुतें पिंडब्रह्मांड हें ऐक्य आहे । परी सर्वही स्वस्वरूपी न पाहे ॥ मना भासलें सर्व कांहीं पहावें । परि संग सोडूनि सूखी रहावें ॥१८७॥ देहेभान हें ज्ञानशस्त्रें खुडावें । विदेहीपणें भक्तिमार्गेंचि जावें ॥ विरक्तीबळें निंद्य सर्वैं त्यजावें । परि संग सोडूनि सूखी रहावें ॥१८८॥ मही निर्मिली देव तो ओळखावा । जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ॥ तया निर्गुणालागिं गूणीं पहावें । परि संग सोडूनि सूखी रहावें ॥१८९॥ नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता ॥ तया निर्विकल्पासि कल्पीत जावें । परि संग सोडूनि सूखी रहावें ॥१९०॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना । तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना ॥ परब्रह्म तें मीपणें आकळेना । मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥१९१॥ मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें । दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें ॥ तया खूण ते हीन दृष्टांत पाहें । तेथें संग निःसंग दोनी न साहें ॥१९२॥ नव्हे जाणता नेणता देवराणा । न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां ॥ नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥ वसे हृदयीं देव तो कोण कैसा । पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा ॥ देहें टाकितां देव कोठें रहातो । परी मागुती ठाव कोठें पहातो ॥१९४॥ वसे हृदयीं देव तो जाण ऐसा । नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥ सदा संचला येत ना जात कांहीं । तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥१९५॥ नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं । रिता ठाव या राघवेंवीण नाहीं ॥ तया पाहतां पाहतां तेंचि जालें । तेथें लक्ष आलक्ष सर्वै बुडालें ॥१९६॥ नभासारिखें रूप या राघवाचे । मनी चिंतितां मूळ तूटे भवाचें ॥ तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥१९७॥ नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे । रघूनायका ऊपमा ते न साहे ॥ दुजेवीण तो तोचिं तो हा स्वभावें । तया व्यापकू व्यर्थ कैंसे म्हणावें ॥१९८॥ अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे । तेथें तर्कसंपर्क तोही न साहे ॥ अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें । दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें ॥१९९॥ कळे आकळे रूप तें ज्ञान होतां । तेथें आटली सर्वसाक्षी-अवस्था ॥ मना उन्मनी शब्द कुंठीत राहे । तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहें ॥२००॥ कदा ओळखीमाजीं दूजें दिसेना । मनीं मानसीं द्वैत कांही वसेना ॥ बहूतां दिसां आपुली भेटि झाली । विदेहीपणें सर्व काया निवाली ॥२०१॥ मना गूज रे तूज हें प्राप्त जालें । परी अंतरीं पाहिजे यत्न केले ॥ सदा श्रवणें पाविजे निश्चयासी । धरीं सज्जनी संगती धन्य होसी ॥२०२॥ मना सर्वही संग सोडूनि द्यावा । अती आदरें सज्जनाचा धरावा ॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे । जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥ मना संग हा सर्व संगांस तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ॥ मना संग हा साधकां शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥ मनाचीं शतें ऐकतां दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ॥ चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ॥२०५॥ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥